भारतापुढील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख आव्हाने

Written by Administrator

भारत हा विकसनशील देश असून लोकसंख्येत तॊ जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. प्राचीन काळी ‘भारतात सोन्याचा धूर निघत असे’ असे म्हटले जात असले तरी आधी मोंगलांच्या चढायांमुळे व नंतर दीडशे वर्षे ब्रिटीश गुलामगिरीत रहावे लागल्याने येथील आर्थिक स्थिती फार खालावलेली आहे. भारत सरकारवर परदेशी कर्जाचे डॊगर आहेत. वाढती लोकसंख्या, गरिबी, अंधश्रद्धा, जातीभेद, भाषाभेद, अज्ञान अशा विविध समस्यांनी भारताची प्रगती रोखून ठेवली आहे. त्यातच परकीय आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या आर्थिक सत्तेच्या जोरावर येथील स्थानिक बाजारात आपले बस्तान बसवित आहेत. राजकीय अस्थिरता, भ्रष्टाचार, अंतर्गत व सीमेपलीकडून होणारा हिंसाचार यांनी लोकशाहीलाच धोका पोहोचत आहे.

 

यावर प्रभावी उपाय शोधण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने व एकात्म भावाने प्रयत्न करण्याची गरज आहे.सुदैवाने आपली बौद्धीक संपदा अपार आहे. त्यात या समस्यावर मात करण्याचे सामर्थ्य निश्चितच आहे. गरज आहे ती ध्येय निश्चितीची व या बौद्धीक संपदेस हे कार्य करण्याची संधी मिळण्याची.

 

सर्वप्रथम शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रातील प्रगतीसाठी कामांची प्राथमिकता निश्चित करणे व त्यासाठी कालमर्यादा, मनुष्यबळ, आर्थिक साहाय्य यांचे नियोजन करणे आवश्यक आहे.

 

स्व. राजीव गांधी यांनी आयटी तज्ज्ञ सॅम पित्रोदा यांच्यावर अशीच जबाबदारी टाकली होती. आता भारत सरकारने आयटी क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ श्री नंदन निलेकाणी यांच्याकडे आधार योजनेचे काम सोपविले. तसेच इन्फोसिसचे अध्वर्यु डॉ. नारायण मूर्ती यांना गुजराथ सरकारने नियोजनबद्ध विकासासाठी निमंत्रित केले या घटना आयटी क्षेत्राच्या वाढत्या सहभागाच्या द्योतक आहेत.

 

मात्र केवळ व्यक्तीगत मार्गदर्शक न नेमता भारतातील मोठ्या आयटी कंपन्यांना प्रकल्प योजना व उभारणीचे काम प्राधान्य क्रमाने देऊन भारतात उपलब्ध असणार्‍या बौद्धिक संपदेचा भारताच्या विकासासाठी उपयोग करणॆ अत्यावश्यक आहे.

 

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. वैश्विक ज्ञानाचा साठा इंटरनेटवर प्रामुख्याने इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याने बहुतांश जनतेपर्यंत तो पोहोचत नाही यासाठी आय टी कंपन्यांना भारतीय भाषांत हे ज्ञान आणण्यासाठी उद्युक्त करण्याची गरज आहे. आज गुगल, याहू व मायक्रोसॉफ्ट असे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर करीत आहे. मात्र त्यांचा त्यामागील उद्देश येथील ग्राहक बाजारावर नियंत्रण मिळविणे हा असल्याने त्याचा परदेशी उत्पादक व सेवा पुरविणार्‍या कंपन्यांना फायदा होणार आहे.

 

आयटी कुशल कर्मचारी भारताचा सर्व भागात, उपलब्ध व्हावेत. त्याना शहराकडे धावण्याचा मोह होणार नाही अशा प्रकारे रोजगारनिर्मिती करण्याची आवश्यकता आहे. सध्या अशा व्यक्तींना शहराशिवाय रोजगार मिळणेही मुष्कील होत आहे.असे शिकलेले लोक शहरात गेले की ग्रामीण छोट्या गावात आयटी शिक्षित व्यक्तींचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीचा ग्रामीण विकसासाठी वा तेथील समस्या सोडाविण्यासाठी काहीही उपयोग होत नाही. शिवाय मोठ्या शहरांच्या समस्याही अशा शहरीकरणामुळे वाढत आहेत. घरांचे भाव गगनाला भिडले आहेत.शहरी सुविधांवर व दळणवळण व्यवस्थेवर तसेच पर्यावरण दर्जावर याचा प्रचंड ताण पडत आहे.

 

या सर्व समस्या विकेंद्रित विकासाने सुटू शकतील व हे विकेंद्रीकरण सर्वप्रथम आयटी क्षेत्राचे व्हावयास हवे व ते शासनाने घडवून आणणे आवश्यक आहे. असे झाले तर ग्रामीण व्यवस्थेत व अन्नधान्य उत्पादनात बिघाड न होता सर्व क्षेत्राचा विकास होईल. घरातील महिला वर्गाला नवा रोजगार उपलब्ध होईल. व भारताचे सर्वंकष प्रगतीचे लक्ष्य माहिती तंत्रज्ञानाच्या या क्रांतीने साध्य होईल. आमच्या ज्ञानदीप फौंडेशनने सर्व शाळा कॉलेजात या माहिती तंत्रज्ञान प्रसारासाठी ज्ञानदीप मंडळे स्थापन करण्याचे व माहिती तंत्रज्ञानाचे विकेंद्रीकरण करण्याचे योजिले आहे. नव्या वर्षातील ह्या ज्ञानदीपच्या उपक्रमास सर्वांचे सक्रीय सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.

खोट्या इ-मेल व स्पॅम जाहिरातींपासून सावधान

Written by Administrator

बर्‍याच वेळा आपल्याला बक्षिस वा लॉटरी लागल्याच्या इ मेल येतात. काही वेळा मोठी रक्कम असलेला आपल्या नावाचा चेकही स्कॅन करून पाठविलेला असतो. इ मेल पाठविणार्‍या कंपनीचे नाव प्रसिद्ध कम्पनीच्या नावाशी मिळतेजुळते असते. त्यामुळे खोटेपणाबद्दल शंका येत नाही. फुकट पैसे मिळणार या कल्पनेने अनेक नवखे वा अनभिज्ञ लोक आपली माहिती ( फोटो, पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर) पाठवितात. नंतर त्याना आपण फसविले गेलो असल्याचे समजते. आपल्या बॅंकेच्या खात्यातून परस्पर पैसे काढले जातात. आपल्या नावावर ऑन लाईन वा दुकानात खरेदी केली जाते. एकदा पैसे गेल्यावर मग काहीच करता येत नाही. कारण इ मेल पाठविणारा गायब होतो. इ मेल पाठविणारी कंपनी अस्तित्वातच नाही हे कळते.
आपल्या मित्राची वा नातेवाईकाची संकटात अडकलेल्याची व मनी ट्रॅन्स्फर एजन्सीद्वारा ताबडतोब पैसे पाठविण्याची मेल आली की आपण गोंधळून जातो. काही वेळा भावनेच्या भरात पैसे पाठवितो. नंतर कळते की त्या मित्राची मेल खोटी होती. कोणीतरी मित्राच्या इमेलचा पासवर्ड मिळवून त्यावरून खोती मेल पाठविलेली असते. अशावेळी त्या मित्राशी फोनवर संपर्क साधावा किंवा त्याच्या दुसर्‍या इमेलवर त्याला मेल आल्याचे कळवावे व खात्री करून घ्यावी.

आपल्याला अनेकवेळा आपल्या मित्रांकडून संपर्क साधण्यासाठी, फोटो पाहण्यासाठी वा अन्य कारणासाठी निमंत्रण मेल येतात. त्यावेळी त्या मित्राचे नाव व मेल पाहून आपण निमंत्रण स्वीकारतो. मग आपले नाव, इमेल अशी माहिती भरायला सांगून आपले नाव सदस्य म्हणून नोदविले जाते. नंतर आपल्या मित्रांना निमंत्रण पाठविण्यासाठी आपला याहू वा जीमेलचा इमेल आयडी व पासवर्ड विचारला जातो. आपल्या पासवर्डचा कोणताही दुरुपयोग केला जाणार नाही अशी ग्वाही दिली जाते. आपण ही माहिती दिली की आपल्या नावाने आपल्या सर्व मित्रांना निमंत्रण पाठविले जाते. सोशल नेटवर्कींगच्या या पद्धतीचा गैरवापर करून अश्लील वा लॉटरीच्या जाहिरातीं पाठविल्या जातात.

वरील सर्व प्रकारच्या धोक्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. याविषयी प्रत्यक्ष अनुभवातील उदाहरणे व अशा खोट्या इ मेलचा प्रसार थांबविण्यासाठी काय केले पाहिजे. इंटरनेटवरच याविषयी काय माहिती आहे. फसविणार्‍या व्यक्ती वा संस्थेचा शोध कसा घ्यावा याविषयी माहिती या ब्लॉगवर देण्यात येणार आहे.


सांगलीतील माझे मित्र व प्रसिद्ध सर्जन यांचा मला फोन आला. त्यांच्या याहू मेलवरून कोणीतरी सर्वांना मेल केली होती की ते अनोळख्या जागी अडकून पडले आहेत. त्यांचे सर्व सामान चोरीस गेले आहे व त्वरीत मनी ट्रॅन्स्फरने त्यांच्या नावे पैसे पाठविण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात त्याना याहू अकौंट उघडता येत नव्हते कारण त्याचा पासवर्ड बदलण्यात आला होता. त्यांनी विचारले आता काय करायचे. मी त्यांना सांगितले की सर्वाना या खोट्या मेलबद्दल सावधान करा व याहू अकौंट बंद करण्यासाठी याहू ऑफीसशी संपर्क साधा.

एकदा मला अमेरिकेतील माझ्याशी इमेलने संपर्कात असणार्‍या लेखकाची मला मेल आली की त्यांना मलेशियात टूरवर असताना कोणीतरी पिस्तुलाचा धाक दाखवून लुबाडले आहे व हॉटेलचे पैसे भरण्यासाठी वा परतीच्या विमानाचे तिकीट काढण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. घरच्या लोकांना काळजी वाटू नये म्हणून त्याना न कळविता माझ्याकडे त्यांनी पैसे पाठविण्याची मागणी केली होती. मी प्रथम त्यांच्या दुसर्‍या इमेलवर निरोप पाठवून मेल खोटी असल्याची खात्री करून घेतली. नंतर सर्वांना तसे कळविण्यास सांगितले.

त्यानंतर अशा मेल आल्या की मी स्पॅम म्हणून काढून टाकत असे.

काल पुण्यात असताना मला अशीच एक पुण्यातीलच माझ्या मित्राच्या नावे मेल आली. स्पेनमध्ये माद्रिद येथे असौन पैसे पाठविण्याची विनंती त्यात केली होती. मी त्या माझ्या मित्राला फोन केला तर त्याने दोन दिवसापूर्वीच त्याचे याहू अकौंट हॅक झाल्याचे त्याने सांगितले. माझ्या मनात आले की खोटी मेल पाठविणार्‍या व्यक्तीस गाफ़ील ठेऊन त्याच्याबद्दल माहिती मिळविली तर. मग मी त्या मेलला उत्तर पाठवून पैसे कसे पाठवायचे याची विचारणा केली. त्याला लगेच उत्तर आले की वेस्टर्न युनियन मार्फत वा मनी ट्रॅन्स्फरने पैसे पाठवावेत. मी त्याला परत मेल पाठविली की तुमच्या आयडेंटिटीसाठी तुमची अधिक माहिती कळवा. माझा उद्देश असा होता की आनखी काय काय माहिती त्याने मिळविली आहे ते जाणणे. अजून काही त्या मेलचे उत्तर आले नाही आल्यावर याच ब्लॉग याबद्दल माहिती देईन.

दरम्यान मी वेस्टर्न युनियनच्या संकेतस्थळावर मेल पाठविणार्‍या व्यक्तीविषयी काही माहिती मिळते का पाहिले. तेथे केवळ इमेलवर पैसे पाठविण्याची सोय होती व स्पॅम व फ्रॉडबद्दल विशेष माहिती होती. स्पेनमधील माद्रिद येथे याविषयी शोध घेता त्यांचेही मनीफ्रॉडविषयी संकेतस्थल असल्याचे दिसले.


संदर्भ संकेतस्थळे
http://www.westernunion.com/info/fraudTips.asp?country=global

http://www.westernunion.com/info/fraudScams.asp?country=global

http://www.phonebusters.com/english/recognizeit_emergency.html

http://www.phonebusters.com/english/reportit.html

एकंतरित पाहता इंटरनेटच्या जाळ्यात अनेक कोळी आपले सावज पकडण्यासाठी ना ना प्रकारची आमिषे वा सोंगे घेऊन बसलेली असतात. त्यांच्यापासून सावध असले पाहिजे. व अशा फसवणुकीविषयी सर्वांना प्रशिक्षित करायची आवश्यकता आहे.